15
नंतर तेमानच्या अलीफजने ईयोबला उत्तर दिले:
 
“ईयोब, जर तू खरोखरच शहाणा
असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस.
शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
विद्वान निरुपयोगी शब्दांनी
आणि निरर्थक बोलण्याने वाद घालत बसेल असे तुला वाटते का?
ईयोब तुला जर तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले तर कोणीही माणूस देवाला मान देणार नाही
आणि त्याची प्रार्थना करणार नाही.
तुझ्या बोलण्यावरुन तुझे पाप चांगले कळते.
ईयोब तू हुशारीने बोलून तुझे पाप लपवायचा प्रयत्न करीत आहेस.
तू चुकत आहेस हे सिध्द करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
का? कारण तू तुझ्या तोंडाने जे बोलतोस ते तू चुकात असल्याचे सिध्द करतात.
तुझे स्वतःचेच ओठ तुझ्याविरुध्द बोलतात.
 
“ईयोब, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का?
टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का?
केवळ तूच एक शहाणा माणूस आहेस असे तुला वाटते का?
ईयोब, तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे.
तुला न कळणाऱ्या गोष्टी आम्हाला समजतात.
10 केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत.
होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्या बाजूला आहेत.
11 देव तुझे सांत्वन करतो
पण ते तुला पुरेसे वाटत नाही.
देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.
12 ईयोब, तू का समजून घेत नाहीस?
तू सत्य का पाहात नाहीस?
13 तू हे रागाचे शब्द उच्चारतोस
तेव्हा तू देवाच्या विरुध्द जातोस.
 
14 “मनुष्य कधीही निष्कलंक असू शकत नाही.
मनुष्यप्राणी देवापेक्षा अधिक बरोबर असू शकत नाही.
15 देव त्याच्या पवित्र दूतांवर विश्र्वास ठेवत नाही.
देवाशी तुलना करता स्वर्गसुध्दा निर्मळ नाही.
16 मनुष्याप्राणी सर्वांत वाईट आहे,
तो अशुध्द आणि कुजलेला आहे.
तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.
 
17 “ईयोब, तू माझे ऐक मी तुला नीट सांगतो.
मला जे माहीत आहे ते मी तुला सांगतो.
18 विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या,
त्या मी तुला सांगतो.
विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या.
त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
19 ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत.
त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
20 हे विद्वान लोक म्हणाले, दुष्ट माणूस जीवनभर यातना भोगतो.
क्रूर माणूस मरण येईपर्यंत भीतीने कापत असतो.
(क्रूर माणसाचे दिवस भरलेले असतात. तो त्या दिवसांत ही यातना भोगतो.)
21 त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते.
जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.
22 दुष्ट माणूस निराश झालेला असतो.
व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते.
त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
23 तो इकडे तिकडे भटकत राहातो परंतु त्याचे शरीर गिधाडांचे अन्न असते.
आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे हे त्याला माहीत असते.
24 त्याला काळजी आणि यातना भयभीत करतात.
एखाद्या राजाप्रमाणे त्याला नष्ट करण्यासाठी त्या त्याच्यावर हल्ला करतात.
25 का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो.
तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो.
तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
26 दुष्ट माणूस अतिशय हट्टी असतो.
तो जाड आणि मजबूत ढालीने देवावर हल्ला करतो.
27 माणूस श्रीमंत आणि धष्टपुष्ट असू शकतो.
28 पण त्याचे शहर धुळीला मिळेल.
त्याच्या घराचा नाश होईल.
त्याचे घर रिकामे होईल.
29 दुष्ट माणूस फार दिवस श्रीमंत राहू शकत नाही.
त्याची संपत्ती खूप दिवस टिकत नाही.
त्याची पिके जास्त वाढत नाहीत.
30 दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते.
तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात
आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
31 निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवून दुष्ट माणसाने स्वतःचीच फसवणूक करुन घेऊ नये, का?
कारण त्याला त्यातून काहीही मिळणार नाही.
32 आयुष्य संपायच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल.
तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फंदीसारखा असेल.
33 दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल.
तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
34 का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते.
जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
35 दुष्ट माणसे सतत दुष्टपणा करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी योजना आखत असतात.
ते लोकांना फसविण्यासाठी योजना तयार करतात.”